मुंबई : राज्यातील १५९ महापालिकांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातही आठही नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत कोरोनामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एप्रिल- मेमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका, पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलून तेथे प्रशासकांची नियुक्ती केली आहे. राज्यातील तब्बल ४० पालिकांच्या पोटनिवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये १५९ पालिकांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर राज्य शासन काय निर्णय घेणार याकडे पुढाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील पालिकांचा निवडणुका यंदा सिंगल वॉर्डनिहाय होणार आहेत. तसा आदेश देऊन शासनाने प्रत्येक पालिकेला सिंगल वॉर्डरचना करण्याचे काम त्वरित हाती घ्यावे, असे आदेश डिसेंबरमध्ये दिले होते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या निवडणुकांची उत्सुकता वाढली होती. वॉर्ड सिंगल, की डबल याची घमासान चर्चा सुरू होती. मात्र, जानेवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वॉर्डरचनेचे काम मागे पडले. प्राधान्यक्रमाने कोरोनाच्या निर्मूलनासह त्यांच्या संक्रमणाला रोखण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यामुळे एप्रिल- मेमध्ये मुदत संपलेल्या व पोटनिवडणुका लागलेल्या पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, तर मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले.
शासानाने तीन दिवसांपूर्वी आदेश काढून मुदत संपलेल्या चारसह पोटनिवडणुका लागलेल्या ४० पालिकांच्या निवडणुकांना ब्रेक दिला आहे. मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासक नेमले आहेत. कोरोना कालावधी संपल्यानंतर निवडणुकांबाबत निर्णय होणार असल्याने तोपर्यंत पालिकांवर प्रशासकाची नियुक्ती निर्णय जाहीर केली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील आठसह राज्यातील १५९ पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर व म्हसवड आदी महापालिकांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या निवडणुकाही पुढे जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्या पालिकांवरही प्रशासकाची टांगती तलवार आहे. सध्या तरी राज्यातील चार महापालिकांवर प्रशासकाची, तर ४० पालिकांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत.