मुंबई : देशात १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं देखील लसीकरण करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय केंद्र सरकारनं थोड्याच दिवसांपूर्वी घेतला.
या पार्श्वभूमीवर राज्यात आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. मात्र यावेळी ज्यात लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती देखील यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
यावेळी, याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे लसींचा पुरेसा साठा नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच, देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं इतर पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५०% साठा केंद्र खरेदी करणार आहे, तर उर्वरित ५०% साठा राज्य सरकारे, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्य सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली.
दरम्यान, राज्यातील लसीकरण ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण १ मेपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र या कारणांमुळे इच्छा असतानाही आम्हाला हे लसीकरण सुरू करता येत नसल्याचं टोपेंनी सांगितलं.