नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून, बाधित रुग्णांच्या संख्येत अतिशय वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात, करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले असून, राज्यात देखील १ मे पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला मार्चच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली होती. यामध्ये आधी ६० आणि नंतर ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसींचा डोस टोचवून घेण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली होती. यांनतर देशभरातून अनेक नागरिकांनी या मोहीमेला प्रतिसाद देत लस टोचवून घेतली.
आता आज केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून वाढत्या करोना बाधितां रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वयाची ही अट शिथिल करून १८ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १८ वर्षांपासून वरील सर्व नागरिकांना लसींचा डोस टोचवून घेण्याची परवानगी मिळाली असून, मोहिमेचा या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी देशभरात १ मे पासून करण्याची शक्यता आहे.