मुंबई : राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांचे आणि त्या पक्षांमधल्या नेत्यांचे अनेक विषयांवरुन मतभेद आहेत, ही माहिती काही महाराष्ट्राला नवीन नाही. बऱ्याचदा हे मतभेद तेवढ्यापुरते न राहता चव्हाट्यावर आले असल्याची उदाहरणे देखील आपल्यासमोर आहेत.
यातच आज ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, सत्तेतील आणि राज्यातील काँग्रेसचे स्थान याविषयी बोलताना सडेतोड भूमिका घेत, “आम्ही याआधीही कित्येकदा सांगितलं आहे, की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही. आमच्या नेत्यांनीही हेच सांगितलं आहे. मान्य आहे आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये, पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं विधान केलं.
दरम्यान, यावरून सत्तेत असूनही शिवसेनेकडून काँग्रेसवर सातत्याने टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी पटोलेंना उत्तर दिलं आहे. “नाना पटोले यांना काँग्रेसशिवाय सरकार असल्याची शंका का यावी. आम्ही हे महाविकास आघाडीचं सरकार बनवताना नेहमी पुढे होतो. सुरुवातीपासूनच आमच्या राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धवजी किंवा अन्य नेते असतील हे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेले नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Read Also :
- “नाना पटोले जे म्हणाले ते…” राष्ट्रवादीकडून दिली गेली पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
- दहावीच्या परिक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम; दोन दिवसांत अंतिम निर्णय
- सरकार काँग्रेसच्या बळावर म्हणता, पण सत्तेत काँग्रेसला किंमत किती?
- “आमच्याकडे प्रस्तावच आला नाही, फाईलच सापडत नाही”, ही राज्यपालांची उत्तरं हास्यास्पद
- सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात “मूक नव्हे, बोलका मोर्चा” काढणार – विनायक मेटे