मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकारचे सुमधुर संबंध सर्वज्ञात आहेत. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. मात्र, यावर राज्यपालांकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, यावरून मधले काही काळ राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले होते.
दरम्यान, या मुद्द्याने परत आपले डोके वर काढले असून, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. “महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. ‘तौक्ते’ चक्रीवादळाने राज्यात प्रचंड नुकसान केले आहे. याचा पाठपुरावा करून, राज्यपालांनी पंतप्रधानांना सवाल विचारले पाहिजेत. मात्र, हे सोडून राज्यपाल, सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल,” असा खोचक टोला सामना अग्रलेखातून राज्यपाल कोश्यारी यांना लगावण्यात आला आहे.
यावर आता काँग्रेसचे नेते आणि मंत्रिमंडळातले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाष्य केले असून, आज आज पत्रकारांशी बोलताना, “माहिती अधिकारातून राज्यपाल नियुक्त १२ आमदार नेमायच्या यादीबाबत माहिती मागितली असता. फाईलच सापडत नाही, प्रस्ताव आमच्याकडे नाही, असे उत्तर जर राजभवनातून येणार असेल, तर ही आश्चर्याची बाब आहे आणि हास्यास्पद देखील आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, ” राजभवनातून देण्यात येणारे हे उत्तर अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी अधिकृतपणे उत्तर दिलं पाहिजे आणि फाइल सापडत नसेल, तर याबाबत योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. तसेच, या संदर्भातला खुलासा राज्यपालांनी सर्वांसमोर येऊन केला पाहिजे. आम्ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या यादी संदर्भात निर्णय करून, रीतसर पद्धतीने प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, असे कसे होऊ शकते, जो प्रस्ताव आम्ही दिला, तो प्रस्ताव त्यांच्याकडे नाही. हे वागणे चुकीचे आहे,” अशी खंत देखील त्यांनी यावेळी मांडली.
Read Also :