मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नाराजी अनेकदा उघडपणे समोर आली आहे. आता पुन्हा एकदा ‘हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही’, अशा स्पष्ट शब्दांत लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील चित्र स्पष्ट करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडी खळबळ माजली असून, राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. यातच, राष्ट्रवादीकडूनही यावर प्रतिक्रिया दिली गेली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, “काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना अधिकार आहे, आणि कोणत्याही विधानाने गैरसमज होईल, असं वातावरण आमच्या तिन्ही पक्षात नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं काँग्रेस पक्षाच्या भूमिकेतून पाहायला गेलं तर बरोबर आहे. त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आणि त्यावर फार काही बोलण्याची देखील मला आवश्यकता वाटत नाही.” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत, राज्यातलं आघाडी सरकारमधलं काँग्रेस पक्षाचं स्थान याविषयी बोलताना, “आम्ही याआधीही कित्येकदा सांगितलं आहे, की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही. आमच्या नेत्यांनीही हेच सांगितलं आहे. मान्य आहे आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये, पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, अशी सडेतोड भूमिका त्यांनी मांडली आहे.
Read Also :