मुंबई : नक्षलवादी संघटनेने मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात उडी घेतली असून, ‘मराठा तरुणांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा, आरक्षण हा खुळखुळा आहे. त्यात आपली शक्ती खर्च घालू नका,’ अशा आशयाचे पत्रक भाकपा माओवादी संघटनेने छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भुमिका उघड केली आहे.
दरम्यान, नक्षलवाद्यांच्या या पत्रकावर आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही प्रतिक्रिया दिली असून, ‘जे नक्षलवाद्यांना कळालं ते आघाडी सरकारला का कळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, माओवाद्यांनी आपली भूमिका उघड केल्यानंतर तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणी लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा माओवाद्यांच्या जाळ्यात मराठा तरुण अडकू शकतात आणि त्याची वेगळी किंमत राज्याला चुकवावी लागू शकते’, असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.
दुसरीकडे, मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजेंनीही या पत्रावर प्रतिक्रिया दिली असून, ‘मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल, तुमचा आदर आहे, मात्र तुम्ही स्वतःला शिवरायांचे खरे वैचारिक वारसदार समजत असाल, तर आमच्यासोबत मुख्य प्रवाहात सामील व्हा,’ असे आवाहन त्यांनी नक्षलवाद्यांना केले आहे.
दरम्यान, आता हे पत्रक खरंच नक्षलवाद्यांकडून जारी करण्यात आले आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. हे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांची असलेली दहशत पाहता खोटे पत्रक काढण्याची हिंमत कोणीही करणार नाही, त्यामुळे आता अचानक नक्षलवाद्यांना मराठा आरक्षणात रुची का वाटत आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे.
Read Also :
- मराठा आरक्षणासाठी दिल्ली दरबारी मोर्चा काढावा? संजय राऊत म्हणतात….
- “ठाकरे सरकारमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?”
- वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे
- “वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..”
- ‘भाजपने सत्य स्वीकारण्याची मानसिकता ठेवाव, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’