मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये, अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते, त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार आहे. ऍड.जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी देत १५ दिवसात अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे.
दरम्यान, गृहमंत्रीपदाचा राजीनामा अनिल देशमुखांनी दिल्याने त्यांच्या जागी, दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती. आता उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “गृहमंत्रिपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच मी त्या पदाची सूत्रं हाती घेणार आहे. ही सूत्रं हाती घेण्यापूर्वी मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं मार्गदर्शनही घेतलं,” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
दिलीप वळसे पाटील सलग सात वेळा आमदार झालेले आहेत. वळसे-पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, सुरुवातीच्या काळात पवार यांचे स्वीय साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. गृहमंत्रिपदासाठी अनेक नावांची दिवसभर जोरदार चर्चा होती. मात्र, पवार यांनी वळसे पाटील यांच्या नावाला पसंती दिली.