औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण औरंगाबाद प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय आहे. अशावेळी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील लॉकडाऊनवरुन AIMIM खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. लॉकडाऊन प्रकरणी चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे १ जुननंतर आम्ही शहरातील दुकाने उघडणार असल्याचा आक्रमक पवित्रा खासदार जलील यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यासह औरंगाबादेतील सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळे आली आहे. १ जुननंतर काही जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल कऱण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. औरंगाबादेत देखिल १ जुननंतर लॉकडाऊन शिथिल कऱण्यात यावा. कारण कोणत्याही नागरिकाची आता लॉकडाऊनला सामोरे जाण्याची तयारी नाही, छोटे-मोठे व्यावसायिक समजुन घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे १ जुननंतर लॉकडाऊन शिथिल केला नाही तर आम्ही स्वत: जाऊन दुकाने उघडणार असल्याचा आक्रमक पवित्रा खासदार इम्तियाज जलिल यांनी घेतला आहे.
यावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे देखिल आक्रमक झाले आहेत. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा इशाराच खैरे यांनी दिला आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या निर्णयांचं पालन झालंच पाहिजे. जलील यांच्या वक्तव्या दखल घेऊन प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खैरे यांनी यावेळी केली.