मुंबई: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक, दुपारी मुंबईहून खाजगी वाहनाने पंढरपूरकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ८-९ तास गाडी चालवली आणि संध्याकाळी त्यांचा ताफा पंढरपुरात दाखल झाला. यांनतर आज पहाटेच्या त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, मोठ्या भक्ती भावाने पार पडली. यावेळी पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील तिथे उपस्थित होते.
यावेळी विठ्ठलचरणी नतमस्तक होऊन त्यांनी, राज्याच्या भल्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. तसेच, देशावर आणि राज्यावर आलेले महामारीचे संकट लवकर दूर होउदे, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाकडे केली. यावेळी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. त्यामुळे गाभाऱ्याचे आणि मूर्तीचे रूप खुलून आले होते.
दरम्यान, राज्यात महामारीची परिस्थिती अजूनही नाजूक असल्याने सोशल डिस्टंसिंगची सक्ती सुरू आहे. प्रवासातही ठराविक प्रवाशांनाच मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या वेळी होणाऱ्या आषाढी वारीसाठी देखील महत्वाच्या पालख्यांना आणि प्रातिनिधिक स्वरूपात वारकऱ्यांना पंढरपुरात येण्याची अट सरकारने घातली होती. त्यानुसार पालख्या आणि काही वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दुसरीकडे, पहाटे शासकीय पूजेच्या वेळी देखील गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून, मंदिर समितीने मुख्यमंत्र्यांसह ५ सदस्यांनाच गाभाऱ्यात उभे राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे, या पूजेत पूर्णपणे महामारीच्या नियमांचे पालन केले गेले. दरम्यान, मागील वर्षीही मुख्यमंत्री हे स्वतः गाडी चालवित पंढरपुरात दाखल झाले होते.
Read Also :
- ‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
- …तेव्हाच मी ईडीसमोर येईन…गायब आणि नॉट रिचेबल असलेल्या देशमुखांनी केला मोठा खुलासा
- योगायोग की…? फडणवीस आणि अजित पवारांनी दिला वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हा एकच संदेश
- काँग्रेसने परत छेडले शिवसेनेला? पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली की स्तुती?
- एकनाथ खडसेंना मोठा धक्का! जावयावर ईडीने केली मोठी कारवाई