मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला असून, या निमित्ताने तरी लोक मुख्यमंत्र्यांना बघायला येतील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.
कोरोना संकट, अतिवृष्टी संकटाच्या काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजपकडून केली जात होती. यावरून आता पुन्हा एकदा भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री घराबाहेर पडले तर त्यानिमित्ताने लोक त्यांना बघायला तरी येतील. ते घराबाहेर पडल्यावर काही लोकांना नक्कीच आनंद होईल, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. ते टिव्ही9 मराठीशी बोलत होते.
आंदोलन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करावा. राज्याची नेमकी काय भूमिका आहे? शरद पवारांनीही अशा प्रकारच्या कायद्याबाबत काय भूमिका घेतली होती? हे जनतेसमोर त्यांनी मांडावं आणि मग भूमिका घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध येत्या आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
Read Also :
- कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार
- … अन् आमदाराने जाहीर कार्यक्रमात थेट सुप्रिया सुळेंकडे केली मंत्रिपदाची मागणी
- ‘भाजपवाले खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरून वर आले’
- धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करा, आता या नेत्याने केली मागणी
- ग्रामपंचायत निवडणूक : विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई