मुंबई : देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, प्राणवायू न मिळाल्यामुळे अनेक करोना बाधित रुगणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या होणाऱ्या या अपुऱ्या पुरवठ्यावरून, अनेक स्तरांतून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरून केंद्राला खडे बोल सुनावले आहेत.
दरम्यान, यावरून केंद्र आणि राज्यं सरकारांमध्ये देखील खडाजंगी सुरु असलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचं सरकार, केंद्राच्या नावाने खडे फोडत असून, रेमेडीसीवर आणि इतर औषधे, लस याचसोबत ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून, सरकारमधील मंत्र्यांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.
यातच, महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का करण्यात आला यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या या युक्तिवादाचा दाखला घेऊन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारला गेलेला जाब म्हणजे केंद्र सरकारकडून सतत अन्याय होत असल्याची हाकाटी पिटत असलेल्या महा विकास आघाडीला सणसणीत थप्पड आहे…आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का? pic.twitter.com/5rBnmIk5xE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 30, 2021
“महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारला गेलेला जाब म्हणजे केंद्र सरकारकडून सतत अन्याय होत असल्याची हाकाटी पिटत असलेल्या महाविकास आघाडीला सणसणीत थप्पड आहे…आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?,” अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी ट्विटमधून केली आहे.