नागपूर : लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकला लसीचा प्रकल्प उभारण्यासाठी पुण्यात जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. मात्र, आता हा प्रकल्प आधी विदर्भात होणार होता, मात्र अजित पवारांनी तो पुण्याला पळवला, असा आरोप आता भाजप आमदाराने केला आहे.
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला आहे.
पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द परिसरातील पूर्ण कार्यरत असलेला १२ हेक्टर जागेवरील कारखान्यात लसनिर्मिती सुरू करण्याचा भारत बायोटेकची सहकंपनी असलेल्या बायोवेटचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवारांवर हा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला आहे. सिरम आणि भारत बायोटेकला मिहानमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी ऐनवेळी राजकीय वजन वापरुन भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात नेला, असा आरोप त्यांनी केला आहे.
हा विदर्भावर अन्याय असून, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते गप्प का बसून आहेत, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
Read Also :
- … म्हणून पुण्यात आज लसीकरण पूर्णपणे बंद राहणार
- तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांनी घेतला तयारीचा आढावा
- केंद्राकडून खतांच्या किंमतीत वाढ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा – प्रवीण दरेकर
- संजय गायकवाडांनी शब्द पाळला, थेट चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे केले वाटप