मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. तर, खासदार संजय राऊत यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहणार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आघाडीतील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे म्हटले आहे.
नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री येत्या काळात झाले पाहिजेत. कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार पडेल, असे ते म्हणाले.
आगामी निवडणुकांबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेसोबत राजकीय मतभेद आहेत, मनभेद नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे, ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री झालं पाहिजे. गावात ग्रामपंचायतीमध्ये लोक एक एक वर्ष किंवा दोन दोन वर्ष सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा सल्ला देखील त्यांनी दिला.
Read Also :