मुंबई : राज्यभरातील 70 हजार आशा कार्यकर्त्यां बेमुदत संपांवर गेल्या आहेत. पगार वाढ आणि वैद्यकीय सुविधा द्याव्यात, या मागण्या आशा कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने या सेविकांच्या सर्व मागण्या मान्य करत त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोना काळात या सेविका अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत. समाधानकारक मानधन, विम्याचे कवच अशा प्राथमिक मागण्या त्यांच्या आहेत.
माझी राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा.
त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा संप लवकर मिटेल, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2021
राज्य सरकारने या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा.त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा संप लवकर मिटेल, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी फडणवीसांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, सरकार कोरोना काळात प्रति दिन 33 या प्रमाणे प्रति महिना 1000 रुपये देत असते. परंतु, हे पैसेही वेळेवर मिळत नाही. त्यात हे पैसेही पुरेसे नाहीत. सरकारने प्रति दिन 300 रुपये मानधन द्यावे, अशी आशा कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याशिवाय कोरोना काळात आशा कर्मचारी, गट प्रवर्तक महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात राखीव बेड असायला हवेत, अशा काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
Read Also :