मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आदोंलन आता देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातून देखील काँग्रेस, राष्ट्रवादीकडून या आंदोलना पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू देखील दिल्लीला निघाले आहेत. यावरून आता भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांनी आधी आपल्या घरातील अंधार दूर करावा आणि नंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवण्यासाठी मोटारसायकलवरून दिल्लीत जाण्याची नौटंकी कडू करत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांची दुरवस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे. आणि हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असे खुले आव्हान देखील कुळकर्णी यांनी कडूंना दिले.
मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी लाचारी पत्करणारे बच्चू कडू घरातला अंधार दूर न करता दिल्लीत उजेड पाडायला निघाले आहेत, अशी जहरी टीका त्यांनी केली.