मुंबई : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे १२वीच्या परीक्षांबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांचा निर्णय घेतला. त्यानुसार मुल्यांकन करुन त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. त्याप्रमाणेच बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र, यासाठी देशभरात एक धोरण असावं. म्हणून पंतप्रधान मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं, अशी मागणी त्यांनी केली.
12वीच्या परीक्षा निकालांवर विद्यार्थ्यांचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. नीट परीक्षा, इंजिनिअरिंग प्रवेश सारखे निर्णय असतात. त्यामुळे देशभरात सुरू असलेल्या या कोविड सारख्या परिस्थितीत 12वी बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्राने एक शैक्षणिक धोरण ठरवायला हवं, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ही परिस्थिती संपूर्ण देश नव्हे जग ग्रासून टाकणारी आहे. 100 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती आली होती. त्यानंतर आता ही परिस्थिती आली. याला आपण आज तोंड देतो आहे. ज्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि पुढील शैक्षणिक गोष्टींवर परिणाम करणार आहेत त्याबाबत पंतप्रधान मोदींनी देशासाठी धोरण ठरवावं अशी विनंती करतो. मी या आधीही ही मागणी केली होती, असे ते म्हणाले.
दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीच्या परीक्षांबाबतही निर्णय घेणार आहोत. पण हा निर्णय संपूर्ण देशभरात एकसारखा हवा. नाहीतर एखाद्या राज्यात परिस्थिती आटोक्यात असेल तर परीक्षा होते तर एखाद्या राज्यात परिस्थिती आटोक्याच्या बाहेर असेल तर परीक्षा होणार नाही. विद्यार्थ्यांचं नेमकं भवितव्य काय? तर त्याच्यात सुद्धा एक समानता असायला हवी. त्यामुळे शैक्षणिक धोरण एक असावं, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.
Read Also :
- ‘इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या’
- ‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’
- ‘सत्तेसाठी आधी हिंदुत्व सोडले आणि आता बाळासाहेबांचे विचारही!’
- ‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
- ‘नव्या भारताचा पाया’ : एकीकडे पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर; दुसरीकडे गंगेत वाहणारी प्रेतं आणि चितांचा धूर