रायगड : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात लागू करण्यात आलेले हे निर्बंध 1 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्बंधांमुळे कोरोनारुग्णांची संख्या देखील कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता 1 जूननंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे.
कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे, हे नक्कीच. पण त्यासंदर्भात आताच काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण याचा अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोव्हिड चौपटीने वाढला, असे मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊनवर भाष्य केले.
सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे, मात्र सर्व बाबींचा विचार करूनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Also :