मुंबई : ठाकरे सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. गेल्या काही महिन्यात राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळाला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात शिफारस केलेल्या या 12 नावांना अद्याप राज्यपालांनी मंजूरी दिली नाही. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने ‘12 आमदारांच्या नियुक्त्या कधी करणार आहात ?’, असा प्रश्न विचारत राज्यपालांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. काठावाला आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठाने यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने म्हटले की राज्यपालांना काहीही झाले तरीही यासंदर्भात निर्णय घ्यावाच लागणार आहे.
न्यायाधीश काठावाला म्हणाले की, त्यांना (राज्यपाल) या शिफारसीबद्दल निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यांनी एकतर याला मंजूरी द्यावी अन्यथा रद्द करावे, मात्र अशाप्रकारे निर्णय राखून ठेवता येणार नाही.
सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी ही याचिका दाखल केली केली आहे, तर त्यांच्यातर्फे वकील गौरव श्रीवास्तव बांजू मांडत आहेत. राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी 12 आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असे देखील सुनावणी दरम्यान श्रीवास्तव म्हणाले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 9 जूनला होणार आहे.
Read Also :