नवी दिल्ली : देश महामारीच्या धगधगत्या झळा सोसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी देशाची आरोग्य यंत्रणा महामारीला थांबवण्यासाठी अपुरी पडत असून, रेमेडीसीवर आणि इतर औषधांचा, लसींचा, बेड्स आणि व्हेन्टिलेटर्सचा तुटवडा जाणवत आहे. तसेच देशभरात ऑक्सिजनच्या अभावी महामारीने बाधित रुग्णांचे दुर्दैवी मृत्य होत आहेत. यामुळे देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात, ऑक्सिजनवरून सुरु असलेल्या सुनावणीत देखील उमटले आहेत. “आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून आजच्या आज दिल्लीला ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे”, अशा परखड शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापले आहे.
तसेच देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये देखील, केंद्र सरकरविरोधात अनेक याचिका दाखल केल्या गेल्या असून, अनेक सुनावण्यांमधून न्यायालयाने केंद्र सरकारला परखड शब्दांत सुनावल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या महामारीला थोपवण्यासाठीच्या केलेल्या नियोजनावर आणि धोरणांवर एकप्रकारे सवाल उभे राहिले असून, देशातील सध्याच्या परिस्थितीला अनुसरून घेतलेल्या निर्णयांवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
यातच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हा एकप्रकरचा उच्चांक असून, २४ तासांत ४ लाखांहून जास्त बाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी देखील वाढू लागली आहे. तसेच देशभरातील भाजपेतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांकडून, काय करतेय केंद्र सरकार, अशा प्रकारचा प्रातिनिधिक सवाल विचारला जात आहे.