पुणे : सध्या देशभरात महामारीसोबतच भयंकर असा म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजाराची बाधित रुग्णांना लागण होत असून, या घातक बुरशीची लागण होऊन मृत झालेल्या नागरिकांची संख्या सध्या देशभरात चिंतेचा विषय बनली आहे. तसेच, या आजाराचे गंभीर स्वरूप ओळखून काही राज्यांनी याला आधीच महामारी म्हणून घोषित केलेलं आहे, तर केंद्राने याचा समावेश साथीच्या रोगांमध्ये केला आहे.
दरम्यान, राज्यात देखील याचा प्रादुर्भाव जाणवत असून, पुण्यात म्युकरमायकोसिसचे ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु यातच आरोग्य यंत्रणेच्या समोर अजून एक संकट उभे ठाकले असून, या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा सध्या राज्यात निर्माण झाला आहे, अशी माहिती पुण्यातील महामारी आढावा बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला एका दिवसाला जवळपास ६ इंजेक्शन द्यावी लागत आहेत. आम्ही या आजारावरील इंजेक्शन्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, सर्व पुरवठा केंद्राच्या हातात असल्यामुळे सध्यातरी आवश्यकतेनुसार इंजेक्शनचा पुरवठा करणे राज्याला शक्य नसल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच, केंद्राकडून राज्याला पुरवठा होत आहे. मात्र आता गरज लक्षात घेऊन म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, असे निवेदन राज्य सरकारने केंद्र सरकारला दिले आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी लॉकडाऊन विषयी बोलताना त्यांनी, ‘पुण्यातील सक्रिय बाधित रुग्णांची संख्या घटत आहे, मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही हवी तशी बाधित रुग्णांची संख्या घटलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपायला अजून १० दिवस बाकी आहे, या दिवसांत काय होतं ते बघून पुढचा निर्णय घेऊ.’ असं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच त्यांनी पुण्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सचा तुटवडा राहिलेला नाही आणि सध्या सर्व प्रकारचे बेड्स उपलब्ध आहेत, अशी आवश्यक माहिती देखील माध्यमांना दिली.
Read Also :
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाणांविरोधात लवकरच होणार औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल
- मराठा असो की मागासवर्गीय, ठाकरे सरकारचा आरक्षणाबाबत सावळा गोंधळ सुरुच
- “देंवेंद्रजी काय राव तुम्ही… तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोकणात जाव लागतयं”
- “ते आले…अन् न पाहताच निघून गेले.”
- मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आणि किती किलोमीटरचा हे मोजून सांगू का, याला दौरा म्हणायचं?