नागपूर : 2019 साली झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा संघर्ष सर्वांनीच पाहिला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काही तासांचे सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र आल्याने राज्यातील राजकारणच पालटले होते. या नाट्यमय घडामोडींबाबत आतापर्यंत अनेक नवनवीन दावे समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सत्तास्थापनेसाठी थेट शरद पवारांशी चर्चा झाली होती, असा दावा केला आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपची चर्चा अजित पवार नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच झाली होती. अगदी खातेवाटपाची बोलणी अंतिम झाली होती, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. याबाबत लोकमतने वृत्त दिले आहे.
खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. ही सगळी चर्चा शरद पवारांसोबतच झाली होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते, असे फडणवीस म्हणाले. ते एका कार्यक्रमात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते.
दरम्यान, फडणवीसांनी फेसबुकच्या माध्यमातून हा दावा केल्यानंतर, काही वेळातच ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झाले. याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटविण्यात आली.
Read Also :
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक
- ‘… त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना लोक बघतील तरी’, भाजपचा खोचक टोला
- कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार