मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. दररोज शेकडोच्या संख्येने नवीन कोरोनारुग्ण आढळत असल्याने, सरकारकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. यातच आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्ट्याचे आयोजन केले जात असते. अशात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर मुंबईत हॉटेल आणि पबवर कारवाई केली जात आहे. मुळे पालिकेला रात्रीच्या वेळी कर्फ्यू लावण्यास प्रवृत्त करू नका, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी केले आहे.
सांताक्रूझ, लोअर परळ, दादर या भागांमध्ये पब व हॉटेल्सवर धाड टाकण्यात आली होती. यावेळी अनेकांनी मास्क लावला नसल्याचे आढळले. फिजिकल डिस्टन्सचे नियम न पाळणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करत 560 जणांकडून पालिकेने दंडाच्या स्वरूपात 43 हजार 200 रुपये वसूल केले.
गर्दी करणे टाळावे व मास्क लावणे हे नियम पाळावे, असे आवाहन करतानाच चहल यांनी कर्फ्यू लावण्यास प्रवृत्त करू नका, असे म्हटले आहे.