मुंबई: भाजप व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीदेखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन’ असं म्हणत शिवसेनेनं फडणवीस यांना चांगलीच कोपरखळी मारली आहे.
‘आमच्या हाती सत्ता दिल्यास चार महिन्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळवून देतो, जर नाही मिळवून दिलं तर राजकीय सन्यास घेऊन अशी घोषणाच फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या याच घोषणेवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून फडणवीसांना चांगलाच टोला लगावण्यात आला आहे.
हे पण वाचा: “…तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, फडणवीसांचं ठाकरे सरकारला थेट आव्हान
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत? ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. याला केंद्राचे सरकार जबाबदार आहे की राज्याचे सरकार जबाबदार आहे, या वादात आता कोणीही पडू नये. पण गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष प्रत्येक विषयात ‘टांग’ टाकून राज्य सरकारला कोंडीत अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव झाला असतानाही ‘भाजप’वाले बाळासाहेबांच्या नावास विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. राममंदिराच्या संदर्भात जमीन घोटाळ्य़ावर कोणी सत्यकथन केले की त्यांना मिरच्या झोंबतात, पण त्या आत गेलेल्या मिरच्या तशाच ठेवून हे लोक हिंदुहृदयसम्राटांच्या नावास विरोध करतात. एखाद्या विषयात आडवे जायचे म्हणजे जायचे हेच एकंदरीत त्यांचे धोरण दिसते’ असा सणसणीत टोला सेनेनं लगावला.
हे पण वाचा: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे वणव्यात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही; दरेकर यांचा इशारा
हे पण वाचा: राजे-बीजे कोणी नाही? मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मागे लागू नका!
‘मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर भाजपने घेतलेली भूमिकाही हास्यास्पदच आहे. हा विषय केंद्राच्या कोर्टात गेल्यामुळेच मुख्यमंत्री थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. त्यामुळे या प्रश्नी आवाज बुलंद करण्यासाठी आंदोलन करावे लागेल ते दिल्लीत, पण दिल्लीचे नाव काढले की यांना पुन्हा ठसका लागतो. आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही तेच दळभद्री राजकारण सुरू आहे’ अशी टीकाही सेनेनं भाजपवर केली.