मुंबई :पोलीस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी गृहमंत्रालयाने ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यात पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. या पोलीस भरतीमध्ये ज्या एसईबीसीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी ४ जानेवारी २०२१ रोजी काढण्यात आलेला शासनादेश (जीआर) रद्द करून राज्य शासनाने तो २३ डिसेंबर २०२० चा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या पद्धतीचं शुद्धिपत्रक सरकारकडून लवकरात लवकर काढण्यात येईल.राज्यात पोलीस शिपाई भरतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार तसेच वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात आली होती. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागणार असल्याचं त्या निर्णयात म्हटलं होतं. पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र गृह विभागाने पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले होते. मात्र पुन्हा याला विरोध झाल्यानं हा जीआर रद्द करण्यात आला आहे.