मुंबई : मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात सुरु झालेला वाद थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीयेत. आज परत चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर दौऱ्यावर असताना, छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली असून, कोपर्डी दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजेंनी देखील त्याला पलटवार केला आहे.
आज इस्लापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ‘संभाजीराजेंचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे. पण आधी मोर्चा काढतो, आता काय आमदार-खासदार जाब विचारणार, नंतर म्हणाले पुणे-मुंबई लॉंग मार्च काढणार, ते नेमकं काय करणार आहेत, हे त्यांनी एकदा नीट समाजासमोर मांडावं. मोर्चा रद्द तुम्ही, त्यात चालढकल करून तुम्ही राज्य सरकारला वेळ देणार आहात?, त्यांना वाचण्यासाठी मदत करणार आहात का?, असा थेट सवाल त्यांनी संभाजीराजेंना केला आहे.
यावर संभाजीराजेंनी कोपर्डी येथे पत्रकारांशी बोलताना, ‘मराठा आरक्षणाप्रश्नी भूमिका स्पष्ट करणार, असे मी जाहीर केले होते. मोर्चा काढणार असे कधीही म्हटले नव्हते. त्यांनी रायगडावरील आणि मुंबईतील माझे भाषण पुन्हा ऐकावे. सांगितल्याप्रमाणे आम्ही मूक आंदोलन ही भूमिका जाहीर केली आहे. माझ्या भूमिकेत कुठलाही बदल नाही,’ असे सांगत त्यांनी, ”चंद्रकांतदादा काही बोलतील, मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही. ते काय किंवा भाजपतील इतर नेते काय मी कोणालाही उत्तर देणं रास्त समजत नाही, देवेंद्र फडणवीस जेव्हा माझ्याबद्दल बोलतील, तेव्हाच मी उत्तर देईन,’ असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे.
तसेच, ‘पाटलांना सकाळपासून संभाजीराजे दिसत आहेत. रोज सकाळी आरती लावतो, तसं त्यांचं झालं आहे. मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मी छत्रपती महाराजांचा वंशज आहे. मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. मी २००७ पासून या लढ्यात सहभागी आहे. हे आंदोलनात कधी आले, मला माहिती नाही,’ अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले.
यावर, ‘संभाजीराजे सारखे म्हणतात, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मी भाजप खासदार नाही, पण प्रत्यक्षात ते ऑन पेपर भाजपकडूनच खासदार आहेत. संभाजीराजे मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे,’ असं सांगत त्यांनी, ”तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघत आहात, की वाट लागण्याची वाट पाहणार आहात,’ अशी प्रत्युत्तरादाखल टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
दरम्यान, आज संभाजीराजेंनी कोपर्डीत जाऊन, निर्भयाच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. ‘कोपर्डी इथल्या प्रकरणानंतर राज्यात ५८ मोर्चे निघाले. त्यांची दखल पूर्ण देशाने घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी योग्य तो न्याय तातडीने मिळावा अशी विनंती केली. मात्र, गेली ४ वर्षे हा खटला न्यायलयातच आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्यात आपण निवास करतो. त्यामुळे, मी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेऊन, स्पेशल बेंच तयार करून निर्भयाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Read Also :
- स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, “आलं अंगावर की, ढकललं केंद्रावर!”; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘संभाजीराजेंना मान्य नसले तरी ते भाजपचेच, कागदावर का होईना खासदार आहेत’
- ‘आगामी महापालिका, झेडपी, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूकही आम्ही स्वबळावर जिंकू’
- पवारांनी कितीही रणनीती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार – फडणवीस
- आमचा विश्वास लोकशाहीवर, राहुल गांधीच बनणार पंतप्रधान – नाना पटोले