मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकही आता महाराष्ट्र विधानमंडळाला भेट देऊ शकतात. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबाबत माहिती देताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. या विधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजवली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल.
ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रारंभी मुंबई विधानमंडळात ही सुविधा सुरू करून कालांतराने नागपूर व पुणे येथील विधानमंडळ वास्तूही जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देशही पटोले यांनी दिले आहेत.
विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्ट्या सहकार्य केले जाईल, असे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
Read Also :
- ‘ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न’
- ‘कोण आहे जेपी नड्डा ? मी त्यांना का उत्तर देऊ ?’, राहुल गांधींचा निशाणा
- संसदेत खासदारांना मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद, पदार्थ महागणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची वर्णी ?
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार