नागपूर – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखले असल्याची माहिती आहे . कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे .
नागपूर पोलिसांनी अडवल्यानंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून दुसऱ्या विमानाने मुंबईला रवाना होण्याबाबत विचारणा करणार असल्याचे कडू यांनी सांगितले . आमच्या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनावर काही विपरीत परिणाम होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असावी, त्यामुळे आपल्याला इथं रोखले जात असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले .
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं. बच्चू कडू यांना नागपुरातचं रोखण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे बच्चू कडू यांना गेस्ट हाऊसमध्ये ताटकळत थांबावे लागले. चार तासाच्या नाट्यानंतर अखेर त्यांना मुंबईला येण्याची परवानगी देण्यात आली. राज्य सरकारनेच बच्चू कडू यांना रोखल्याने त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून रिलायन्स विरोधातील आंदोलनाला हवा मिळावी म्हणूनच बच्चू कडू यांना नागपुरात रोखून धरले असावे का असा सवाल उपस्थित झाला आहे.