मुंबई : देशात एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून, दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने, केंद्र सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला, महामारीच्या उच्चाटनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाऊन लावणार का? असा सवाल विचारला जात होता.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक सल्ला दिला आहे. “देशात महामारीचे संकट मोठं आहे. त्यामुळे या संकटातून सुखरूपणे बाहेर पडण्यासाठी पंतप्रधांनानी सर्व पक्षीय बैठक बोलवावी आणि त्यातून मिळून मार्ग काढावा, असं ते म्हणाले आहेत.
तसेच, यावेळी त्यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा दाखला देत, आधी विरोधक जे बोलत होते, तेच आता स्वामी बोलत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुडवडा आहे, पंतप्रधानांचं नियोजन नाही, परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे. त्यामुळे मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घेण्याची गरज आहे, मोदी एकटे महामारीशी लढू शकत नाही, असं म्हणत मोदींना खोचक सल्ला देखील दिला आहे.