मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधारी आणि विरोधक पहिल्याच दिवशी आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून हा धक्काबुक्कीचा प्रकार झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला असून, परिणामी भाजपच्या १२ आमदारांवर १ वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांनी मात्र, या आरोपाचं खंडण केलं आहे.
भाजपचे आमदार सभागृहात धमकी देत आहेत; नाना पटोलेंचे गंभीर आरोप
दरम्यान, यावरून आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लबोल केला असून, यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यामंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका करताना, “अध्यक्षांच्या दालनात अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव काम करत होते, त्यांना जाऊन भाजप नेत्यांनी घेरलं. त्यांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली, अशी घटना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात कधीही घडलेली नाही आणि सर्वात जास्त दुःखद ही बाब आहे, की हे घडत असताना या सगळ्या शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा पुढाकार विरोधी पक्षनेते करत होते,” असा दावा केला आहे.
भाजप आमदारांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या – तालिका अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
तसेच, “गुंडगिरी दाखवून सत्ता घेता येत नाही. हे जनतेने निवडून दिलेलं ३ पक्षांचं सरकार आहे. सरकार हे बहुमताच्या आधारावर सरकार चालतं. उठसुठ धमक्या द्यायच्या, कधी सांगायचं तुरूंगात टाकू आणि आता यातूनही काही घडत नाहीये, तर आता सरळ गुंडगिरी, मारामारी करण्याचं कृत्य भाजपची लोक करत आहेत. देशाच्या लोकशाहीला घातक मार्गावर नेण्याचं हे काम आहे. आम्ही हे कधीही सहन करणार नाही,” या शब्दांत त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
काय घडलं सभागृहात?
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी काही आक्रमक आमदारांनी, पुढे हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. एका आमदाराने तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. या गदारोळात धक्काबुक्की देखील झाली असल्याचा आरोप विरोधकांवर करण्यात आला असून, परिणामी या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Read Also :
- १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची तातडीची बैठक; राज्यपाल कोश्यारींची घेणार भेट
- भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
- विधानसभेचं वातावरण तापलं, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ
- सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन