मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाने दाखल केलेल्या हक्कभंग प्रकरणी गोस्वामींना अटक न करण्याचे आदेश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेंचनं दिला आहे. अर्णव गोस्वामींना दिलासा देतानाच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधीमंडळ सचिवांना नोटीस बजावलं आहे. विधीमंडळाच्या सचिवांना नोटीस देत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हक्कभंग प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी अटकेपासून संरक्षण दिलं आहे. अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र विधीमंडळानं बजावलेल्या हक्कभंग नोटीसाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला होता.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून पोलिसांना बुधवारी अटक केली होती. पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा गोस्वामी न्यायायलात केला. भाजपचे अनेक नेते हे गोस्वामींवरील कारवाईवरुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करीत आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होत आहे.