मुंबई – कोरोनाची लाट त्यात आलेली दिवाळी आणि थंडीची लागलेली चाहूल यामुळे राज्यात फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी काही मंत्र्यांनी केली होती. मात्र यावरून मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरुवारी मंत्रिमंडळच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात काही मंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालावी ही मागणी केली तर काहीनी त्यास हरकत घेत विरोध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटाके बंदी करावी ही आग्रही भूमिका घेतली. त्याच्या भूमिकेस काहीजणांनी हरकत घेतली. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. फटाके व्यावसायिकांनी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. अचानक असा निर्णय घेतला तर त्यांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली गेली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा फटाकेबंदी करावी या मताचे असल्याचे संकेत त्यांनीच दिले होते. एकमत होत नसल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर नंतर चर्चा करू असं सांगत विषय थांबवला. आता मुख्यमंत्री संबंधित सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतली अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.