मुंबई : देशभरात महामारीने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातदेखील अशीच परिस्थिती असून, याचा मोठ्या फटका आरोग्य यंत्रणेला बसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, बेड्स, लस यांची राज्यात कमतरता जाणवत आहे, मात्र यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान, देशात १ मेपासून लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. तसेच, अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली असून, राज्यात मात्र ठाकरे सरकारकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून, संभाव्या मोफत लसीकरणाच्या श्रेयासाठी अनेक उलट सुलट विधानं केली जात असल्यामुळे, मोफत लसीकरणाला घेऊन एकूणच गोंधळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली, तर दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केलं. मात्र नंतर हे ट्विट डिलीट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. दरम्यान, यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोफत लसीकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
“हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.