मुंबई : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आहेत. त्या नात्याने पक्ष वगैरे बाजूला ठेवून त्यांनी गुजरातच्या बरोबरीत महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज मिळावे असे मोदी साहेबांना सांगायला हवे. गुजरातला चोवीस तासांत हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही हा सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय?, असा खोचक सवाल शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी त्वरित गुजरातचा दौरा करत मोठी मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर केली नाही. यावर सामना अग्रलेखातून भाष्य करत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
गुजरातला एक हजार कोटी देणाऱया केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले. तीच ममता महाराष्ट्राच्या वाटय़ाला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती. मुख्यमंत्री ठाकरे आज कोकणच्या दौऱयावर निघाले आहेत. वादळाने लोकांच्या चुली भिजल्या व विझल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच विझलेल्या चुली पेटविण्याचे बळ देतील. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला हजार कोटी दिले म्हणून बोटे मोडायचे कारण नाही. मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देत असते याचे भान ठेवून दिल्लीश्वर कोकणातील वादळग्रस्तांसाठी दोनेक हजार कोटी देतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?, असे शिवसेनेने म्हटले आहे.
गुजरातला मदतीचे एक हजार कोटी दिले म्हणून महाराष्ट्राला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. गुजरात हे महाराष्ट्राचे जुळे भावंडच आहे. पण मदतीच्या बाबतीत अलीकडे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे हे योग्य नाही, असे देखील शिवसेनेने सुनावले आहे.
कोरोनामुळे हा व्यवसाय आधीच ठप्प झाला. त्यात हा वादळाचा तडाखा. सावंतवाडी, तारकर्ली, मालवण, देवबाग, अलिबाग, वसई, विरार, केळवे, माहीम समुद्रपट्टीवरील पर्यटन व्यवसाय कालच्या तडाख्याने जमीनदोस्त झाला. त्यामुळे हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. या सगळय़ांची काळजी महाराष्ट्र सरकार घेईलच, पण गुजरातला हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा? याआधी कोरोना लसीच्या बाबतीत हेच घडले व आता वादळाच्या नुकसानभरपाईबाबत तेच दिसत आहे, अशा शब्दात शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- ‘…म्हणून पंतप्रधान मोदींनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली’
- पोलीस भरतीबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- गृहमंत्री वळसे-पाटील
- तौक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्री ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला आज भेट देणार, असा असेल दौरा
- ‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवणार’
- मराठा आरक्षणाबाबत फडणवीस आणि भाजप दोघेही ‘डबल ढोलकी’