सांगली : राज्यात एका मागोमाग एक अडचणी येत आहेतच. अनेक मागण्यांसाठी नेते, लोकं आक्रमक होत आहेत. अशात रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. दूधाचा भाव वाढवून देण्यासाठी मागणीसाठी सदाभाऊंनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. रयत क्रांती संघटनेकडून १० जूनला दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात चाबूक फोडो आंदोलन करण्यात येणार आहे. तशी माहिती सदाभाऊ खोत यांनी आज (७ जून) सांगलीमध्ये दिली. त्याचबरोबर कोरोना महामारीचं संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, हे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार असल्याची टीकाही खोत यांनी केली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुधाला ८ रुपये प्रति लिटर कमी भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकालाही सहकारी आणि खाजगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत आहे. मात्र, दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई करण्याचं काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकंच नाही तर खाजगी दूध संस्थांवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
असं असेल तर हा दुग्ध विकास विभागच बंद झाला पाहिजे, अशी टीका खोत यांनी केलीय. दूध खरेदी दरात राज्य सरकारकडून वाढ झाली पाहिजे, या मागणीसाठी 10 जून रोजी रयत क्रांती संघटनेकडून राज्य सरकारच्या विरोधात चाबूक फोड आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सदाभाऊंनी केलीय. ऊसाच्या एफआरपीप्रमाणे दुधाचा दरही राज्य सरकारने ठरवला पाहिजे, अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली आहे.
‘कोरोनाच्या महालात झोपलेलं हे भुताटकीचं सरकार’ – सदाभाऊ खोत
कोरोनाच्या महालात झोपलेलं हे भुताटकीचं सरकार कुणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवतं. मराठा आरक्षणाबाबतही या सरकारकडून केंद्राला साकडं घालण्याचा उद्योग करण्यात येत आहे. मग गेली दीड वर्षे तुम्ही काय झोपा काढत होते का? ठाकरे सरकारने आता केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडं घातलं पाहिजे, अशी जोरदार टीका सदाभाऊ यांनी केली.
‘आषाढी वारीला परवानगी द्या’
पंढरपूरच्या वारी बाबत राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेऊन परवानगी देणे गरजेचं आहे. कारण राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असतील तर आषाढी वारीला काय अडचण आहे ? असा सवाल खोत यांनी केलाय. वारकरी संप्रदायाने यंदा वारी काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा. रयत क्रांती संघटना त्यांच्यासोबत असेल असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
Read Also :
- सरकार काही जात नाही, फडणवीस तुम्ही सरकार पडण्याची वाटच बघा – एकनाथ खडसे
- नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; खडसेच्या टिकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटणार
- .‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती