रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आलेले आहे. न्यायालयाकडून देखील त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, इतर क्षेत्रातील व्यक्ती देखील यावर मत व्यक्त करत आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून दोन गट पडले असले तरी, काहीजणांना मात्र आनंद झाल्याचे दिसत आहे. तर कोणी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. तर आता अन्वय नाईक प्रमाणेच ठाकरे सरकार शेतकरायण न्याय कधी देणार असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
अन्वय नाईक नंतर आता एका शेतकऱ्याचा मुद्दा समोर आला आहे. आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी दिलीप ढवळे यांनी २०१९ मध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती या चिट्ठीत शिवसेनेचेखासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव समोर आले होते. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे दिलीप ढवळे हे शिवसैनिक होते
ढवळे कुटुंबीयांनी उस्मानाबाद येथे गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मागील वर्षभरापासून रखडलेल्या तपासावर संताप व्यक्त केला. “अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत ज्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, अगदी तसेच आपले दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला
त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रकणाची दखल घेऊन उस्मानाबादचे शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियांना न्याय देणार का? खासदार ओमराजे निंबाळकर यांना अर्णब गोस्वामी प्रमाणे चौकशी करून अटक करण्यात येईल का? त्यानंदेखील न्यायालयीन कोठडी दाखवण्यात येईल कि नाही? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.