मुंबई : राज्य सरकार मंत्रिमंडळाने चंद्रपुरमधील दारू बंदी हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता यावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे. ठाकरे सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय, असा गंभीर आरोप आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ठाकरे सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय. आरक्षणाचा विषय सोडून देऊन दारुबंदी हटवल्यानं आनंदी व्हा असं काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगितलंय. अवैध विक्री होते म्हणून गांजा, ड्रग्ज, गुटखा, प्लास्टिकवरील बंदीही उठवणार का?, असा सवाल त्यांनी केला.
चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. सरकारने हा निर्णय घेताना काय तर्क लावलाय माहिती नाही. जर अवैध दारु विकली जाते म्हणून दारुबंदी हटवली असेल तर तो प्रकार वर्धामध्येही होतो. तेथे महात्मा गांधींचा आश्रम आहे ती त्यांची कर्मभूमी आहे म्हणून तिथे तसा निर्णय नाही का? सरकारचा तर्क पटत नाही, असेही ते म्हणाले.
अवैधपणे विक्री होते म्हणून बंदी हटवणार असाल तर गांजावरील बंदी हटवणार आहेत का? ड्रग्ज पार्टी अवैधपणे होतात, रेव्ह पार्टी होतात हे सुरु करणार का? या सरकारचं दारुवर खूप प्रेम आहे. कोरोनाच्या काळात सरकारने इतर निर्णय घेतलेले नाहीत, पण दारुवर यांनी घाईघाईने निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली.
Read Also :