आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील मुंबईतल्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. आणखी काय सांगणार. असे क्षण शब्दात व्यक्त करता येत नाहीत. शिवसैनिकांप्रमाणे माझ्याही आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे देशाचे मोठे नेते होते. मार्गदर्शक होते. त्यांचे विचार आजही मार्गदर्शकच आहेत. त्यांचे सर्वांशीच ऋणानुबंध होते. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षाचे नेते राजकीय उंबरठे ओलांडून या कार्यक्रमाला आले, ही आनंदीची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हा भावूक क्षण असल्याचं सांगितलं. शिवसेनाप्रमुखांचं मुंबईवर अपार प्रेम होतं. त्याच मुंबईत आज त्यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा वेगळा आणि आनंदाचा क्षण आहे, असं आदित्य म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बराच वेळ हा पुतळा न्याहळत होते. कारण मुख्यमंत्री स्वत: कलावंत आहेत. त्यामुळे पुतळ्यातील बारकावे ते टिपत होते. याआधी पुतळा बनविण्याचं काम सुरू असतानाही त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also
“जयंत पाटील हे राजाराम बापूंच्या जागी गुणवत्ता नसताना अनुकंपाच्या जागेवर राजकारणात अनवधानाने आले”
बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी