मुंबई : माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगल्यासह इतर शासकीय निवासस्थानांचे 24 लाखांपेक्षा अधिक पाणी बिल थकीत असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरुन पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केल्यानंतर केला होता. यावर आता मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय बंगल्याचे पाणी बिल थकीत नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी असलेला तोरणा बंगला या दोन्हीची थकबाकी निरंक आहे, असा अहवाल मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल स्थित ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर) यांचाही समावेश आहे. मात्र मुंबई महापालिकेने हा दावा खोडून काढला आहे.