अहमदाबाद : गेल्या आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व जागा लढवणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. केजरीवाल आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गुजरातमध्ये आपआपलं दुकान चालवत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला मदत हवी तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना मालाचा पुरवठा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये २७ वर्षांपासूनचा दोस्ताना आहे. ही दोस्तीच ते निभावत आहेत. त्यामुळे जनतेचं मात्र शोषण होत आहे, असं केजरीवाल म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग इथं का नाही? तशाप्रकारे इथल्या रूग्णालयांची परिस्थिती देखील मागील ७० वर्षांपासून सुधारलेली नाही. मात्र आता परिस्थिती बदलेल, असं त्यांनी सांगितले.
सध्या काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. व्यापारी वर्ग बिथरलेला आहे. याला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. गुजरात मॉडल सध्या खराब परिस्थिती आहेत. आम्ही हे मॉडल दुरुस्त करू, असं ते म्हणाले. यापूर्वी केजरीवाल फेब्रुवारी महिन्यात सूतरला गेले होते. आपने गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी मोठं यश मिळवलं होतं.
Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/3GXvtPVfMt
— ANI (@ANI) June 14, 2021
प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्यात तिसरी आघाडी स्थापन होण्यावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही शरद पवार हे देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असं सांगितलं होतं. मात्र, हे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच आपने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also :
- भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे वारी; संत मुक्ताई पालखीचा प्रस्थान सोहळा उत्साहात
- राम मंदिर ट्रस्ट घोटाळा : सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत
- संभाजीराजेंच्या आंदोलनाला माझा ठाम पाठिंबा; आरक्षण देणे ठाकरे सरकारची जबाबदारी
- उद्धव ठाकरेच राहणार की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळे म्हणतात…..
- पुणेकरांनो नवीन नियम पाळा, महामारीपासून बाधित होणे टाळा!