पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत भाजप नेते नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही?, अस सवाल राणेंनी केला होता. त्यांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले आहे.
नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली का? हे इतक्या वेळी मुख्यमंत्री होते, ते तितक्या वेळी मुख्यमंत्री होते. इतर वेळी म्हणायचं शरद पवार आमचे नेते आहेत, शरद पवारांचं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी वेगळं सांगतोय, असं करून शरद पवारांबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करायचं, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी नेहमीच ५० वर्षांच्या राजकीय जीवनात काम करत असताना, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचीच भूमिका घेतलेली आहे. आताही शरद पवार यांची भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे.
इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तशा प्रकारचा प्रयत्न शेवटपर्यंत झाला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. नारायण राणेंना समजत नाही का? सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे. हा काही सरकारने निर्णय घेतला आहे का?, असा सवाल देखील त्यांनी राणेंना केला.
Read Also :