मुंबई : राज्यात 1 मे पासून 18 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मात्र लसच उपलब्ध नसल्याने अनेक केंद्र बंद करावी लागली आहेत. आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे तुर्तास लसीकरण केले जाणार नसल्याचे म्हटले आहे. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर म्हणाले की, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची असून, या वयोगटातील नागरिकांकरिता राज्य सरकारने स्वतः लसींची खरेदी करून लसीकरण करायचे आहे. असे असताना सुद्धा स्वतः लस खरेदी करण्याची प्रक्रिया न राबवता केंद्राकडे बोट दाखवत, केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे.
21 एप्रिल रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लसीकरण धोरणानुसार देशात उत्पादन होणाऱ्या 50 टक्के लसी राज्य सरकार थेट कंपन्यांकडून विकत घेऊ शकते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्यापही खरेदी प्रक्रिया राबविली नाही, असेही ते म्हणाले.
28 एप्रिलला राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने लस खरेदीच्या प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीचा शासन निर्णय नऊ दिवसांनी म्हणजेच 7 मे रोजी काढला. 12 कोटी डोसची आवश्यकता असतानासुद्धा या शासन निर्णयात केवळ 7.70 लाख डोसच विकत घेण्यास का मान्यता देण्यात आली?, असा सवाल देखील त्यांनी केला. राज्य सरकारला लस खरेदी करण्याची परवानगी असताना सुद्धा लस खरेदी करायची नाही आणि खासगी हॉस्पिटल्सला लस खरेदी करू देऊन नागरिकांना त्यांच्याकडून लस विकत घेण्यास भाग पाडायचे असा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप देखील भातखळकर यांनी केला.
Read Also :
- 12 विरोधी पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या ‘या’ मागण्या
- ‘सुप्रीम कोर्टाने टास्कफोर्स स्थापन करून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब केले’
- लॉकडाऊन वाढवला, लसीकरण स्थगित; ठाकरे सरकारचा निर्णय
- बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा चर्चेत, म्हणाले…
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम