नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशा शब्दात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांन केली.
लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते परंतु मोदी सरकारने हा आत्माच संपवण्याचे काम सुरु केले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करुन कोर्टाने कोविडमध्ये हस्तक्षेप करु नये, कोर्ट या विषयातील तज्ञ नाही असे म्हणत कोर्टाचा अवमान केला आहे, असे पटोले म्हणाले.
कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे, असंही ते म्हणाले.
केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपाचे नेते हे सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसेच भाजपाच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला, असा टोला देखील त्यांनी यावेळी भाजप नेत्यांना लगावला.
Read Also :
- लॉकडाऊन वाढवला, लसीकरण स्थगित; ठाकरे सरकारचा निर्णय
- बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा चर्चेत, म्हणाले…
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस