मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरा सुरु केला. तसेच, त्यांनी राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे आणि हा मुद्दा कसा महत्वाचा आहे हे सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आता चांगलेच अडचणीत सापडले असून, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आज ते तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी परत एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, तेव्हा आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली, मी स्वतः मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला दिला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी माझ्या त्या भूमिकेचं कौतुक केलं. आता ते मला त्यांनी मला कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत, पण मी आधीपासूनच समाजाचा योद्धा आहे. त्यांना मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं वाटत असेल, तर त्यांनी माझ्या ५ मागण्या आधी पूर्ण कराव्यात,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तसेच, “मी माझी पुढील भूमिका ६ जून रोजी करणार स्पष्ट करणार आहे. त्याआधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा. त्यांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय द्यावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर मार्ग काढू, असं जाहीररित्या सांगितलं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील,” असा विश्वासही संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- आरक्षणासाठी OBC जनगणनेची आवश्यकता नाही – देवेंद्र फडणवीस
- ‘आरक्षणप्रश्नी कोणासोबतही चर्चेला तयार, फक्त समोरच्यांनाही एकच सूचना…’
- देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
- मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा अन् धावली मेट्रो राणी…
- पिंपरी चिंचवडच्या उद्योगांना ऑक्सिजन द्या; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला आदेश