मुंबई : गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. मात्र, यावर राज्यपालांकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे मधले काही काळ राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले होते.
आता परत एकदा याच मुद्द्याने डोकं वर काढलं असून, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे आणि माहिती अधिकाराच्या कायद्याच्याद्वारे, अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आजच्या सामनामधून याच मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला असून, ““महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. ‘तौक्ते’ चक्रीवादळाने राज्यात प्रचंड नुकसान केले आहे. याचा पाठपुरावा करून, राज्यपालांनी पंतप्रधानांना सवाल विचारले पाहिजेत. मात्र, हे सोडून राज्यपाल, सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल,” असा खोचक टोला सामना अग्रलेखातून राज्यपाल कोश्यारी यांना लगावण्यात आला आहे.
यावरून आता भाजप आणि शिवसेना यांच्यात जुंपली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्यांच्या टीकेला काय उत्तर द्यायचं? संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर वाट्टेल ते तथ्यहीन बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नेहमीच प्रतिक्रिया द्यावी असं थोडीच आहे,” अशा शब्दांत टीकेचा समाचार घेतला आहे.
Read Also :
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच काँग्रेसशिवाय सरकार असल्याची शंका का यावी?’
- “नाना पटोले जे म्हणाले ते…” राष्ट्रवादीकडून दिली गेली पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
- दहावीच्या परिक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम; दोन दिवसांत अंतिम निर्णय
- सरकार काँग्रेसच्या बळावर म्हणता, पण सत्तेत काँग्रेसला किंमत किती?
- राजभवनात कोणतं वादळ आलं की तिथं भूत प्रेत येतात