कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसची वाट धरल्याने भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. मुकुल रॉय यांच्या घरवापसीनंतर बंगालमध्ये भाजपामधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यादरम्यानच मुकुल रॉय हे पश्चिम बंगालनंतर अजून एका राज्यात भाजपाला सुरुंग लावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांचे निकटवर्तीय असलेले ३० आमदार पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या परिवर्तनाचा प्रभाव त्रिपुरामध्येही दिसण्याची शक्यता आहे. मुकुल रॉय यांचे निष्ठावंत असलेले सुदीप रॉय बर्मन हेसुद्धा तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे चर्चेत असणारे सुदीप रॉय बर्मन हे पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये आल्यास त्यांच्यासोबत काही आमदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात. त्रिपुरामधील प्रभावशाली नेते मानले जाणारे सुदीप रॉय बर्मन हे मुख्यमंत्रिपदाची माळ बिप्लब देव यांच्या गळ्यात पडल्यापासून नाराज आहेत. ते काँग्रेसमध्ये असताना ते विरोधी पक्ष नेते होते. तर भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष तृणमूल काँग्रेससोबत काम केले होते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुदीप रॉय बर्मन हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मात्र ममता बॅनर्जी यांनी त्याला मान्यता न दिल्यास ते स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवू शकतात. त्यांनी आधीच बंधुर नाम सुदीप नावाची एक संघटना स्थापन केली आहे. ही संघटना पुढच्या काळात भाजपाला विरोध करू शकते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी किंवा नंतर आघाडी बनवण्याशिवाय तृणमूल काँग्रेससाठी दरवाजा उघडा ठेवण्यात मदत मिळेल. त्याशिवाय शाही परिवाराचे प्रमुख प्रद्योत माणिक्य देवबर्मा यांच्यासोबतही बर्मन हे आघाडी करू शकतात. त्यांचा पक्ष TRIPRA स्थानिक निवडणुकीत भाजपाला घेरण्यात यशस्वी ठरला होता.
Read Also :
- ‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज राजभवनात सुनावणी होणार
- केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील ‘या’ दिग्गजांना मिळणार स्थान?
- ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
- ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’