मुंबई : गेल्याकाही दिवसात महाविकास आघाडीत सत्तेत असून देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. असे असले तरीही त्यांनी पुढील 5 वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले. यावरून आता भाजप नेते राम कदम यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे.
नाना तुम्ही पण, उगाच काही तरी. काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का? तुमचे सोडा तुमच्या हाय कमांडची देखील दयनीय अवस्था आहे. सामना पाहू नका. जमल्यास वाचा. कशी लाज तुमच्या नेतृत्वाची काढली जाते ते पहा. हो ! हे खर आहे. काँग्रेसला स्वाभिमान आहे का? हा सवाल आहे, असा खोचक टोला राम कदम यांनी ट्विट करत पटोलेंना लगावला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी स्थानिक संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे.
Read Also :