मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे कोसळली आहेत, तर घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पडझड झालेल्या घरांची तात्काळ दुरुस्ती करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या फळ बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तोक्ते वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर मदतकार्य सुरू करावे, असे वडेट्टीवार म्हणाले.
वीज, रस्ते, पाणीपुरवठा योजना यांची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात यावी. तसेच पुढील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता ज्या लोकांच्या घराचे नुकसान झाले आहे त्याची दुरुस्ती लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्तांना अन्न धान्य केरोसिन व जीवनावश्यक साहित्याची तत्काळ मदत करा, असे सांगतानाच नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यासाठी नुकसानीचा प्राथमिक अंदाज लगेच सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Read Also :
- ‘…त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिकेचा निर्णय घेणार’
- लसीकरणात महाराष्ट्र अव्वल, पार केला 2 कोटींचा टप्पा
- ‘काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन…’, चंद्रकांत पाटलांचे कळकळीचे आवाहन
- ‘काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’
- ‘भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष’