मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या दणदणीत विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता पवार आणि किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या भेटीनंतर राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील समीकरणं बदलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शरद पवारांची भेट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केलेली व्यक्तीगत चर्चा, त्यानंतर काल शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगत शिवसेनेबद्दल व्यक्त केलेला विश्वास या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी व्यूहनीती आखण्यासाठी ही भेट होणार असल्याचं बोललं जात आहे.
मे महिन्याच्या सुरुवातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पाचपैकी तीन राज्यांमध्ये बिगरभाजप पक्षांना सत्ता मिळाली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपचं आव्हान यशस्वीपणे परतवून लावलं. त्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा सिंहाचा वाटा आहे. भाजपला १०० हून अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा किशोर यांनी केला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. मात्र किशोर यांचा दावा अगदी अचूक ठरला आणि सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलचे अंदाज चुकले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. आपण यापुढे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नाही. आपण इथेच थांबत असून लवकरच नवीन काहीतरी करू, असं किशोर बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणाले होते. त्यामुळेही प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीकडे लक्ष लागलं आहे. प्रशांत किशोर पुन्हा सक्रिय होणार का, २०२४ च्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read Also :