मुंबई : उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसात अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपची वाट धरल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून भाष्य करण्यात आले असून, राहुल गांधींना मोलाचा सल्ला देखील यात देण्यात आला आहे.
सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.
‘आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱयांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
Read Also :